प्रेम बिऱ्हाडे नावाच्या तरुणाने इंग्लंडमधील जॉब पुण्यातील मॉडर्न कॉलेजने केलेल्या जातीयवादामुळे गेला अशा प्रकारचा व्हीडिओ बनवला आणि तो viral झाला. त्यावर सर्वत्र मीडियात चर्चा सुरू झाली. मीडिया ती बातमी अशाप्रकारे दाखवतोय की ही बातमी 100% खरी आहे. जेव्हा जेव्हा प्रश्न ठराविक राजकीय विचाराच्या दलितांचा येतो, तेव्हा मीडियाचा आणि लोकांचा सद्सद्विवेक, पडताळणी करण्याची क्षमता, हे सगळं काही एका क्षणात गायब होऊन जातं.
मीडियाला एकांगी बनवण्याची ही सुपरपावर विशेष प्रकारच्या दलित समूहालाच लागू होते. मागे रोहित वेमुला नावाच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली असताना अशाच unverified news चा बाजार उठला होता. त्या बिचाऱ्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली, यापेक्षा त्याची जात महत्त्वाची ठरवून सर्व गाजावाजा सुरू होता. विशेष म्हणजे हे जात पाहून गाजावाजा करणारे लोकच जाती अंताची भाषा करण्यात पुढे असतात. काही दिवसांनी रोहित वेमुला हा मुळात दलित नव्हताच ही गोष्ट समोर आली, आणि अचानक सर्व माध्यमांचा आणि कार्यकर्त्यांचा त्याच्या आत्महत्येत असलेला इंटरेस्टच निघून गेला. रोहित वेमुला प्रकरणात खोट्या बातम्या, ब्राह्मणी व्यवस्था, मनुवाद, सनातनी अत्याचार ह्या वेगवेगळ्या राजकीय भाकऱ्या मात्र शेकून घेण्यात आल्या होत्या.
प्रेम बिऱ्हाडे प्रकरणही त्याच वाटेवर जात आहे. कोणत्याच जातीच्या विद्यार्थ्यांची कॉलेजच्या ढिसाळ कारभारामुळे नोकरी जाऊ नये. प्रेमला हा दुर्दैवी अनुभव आला याची सहानुभूती आहे. मात्र हा अनुभव जातीमुळे आला, याला काही संदर्भ, पुरावा लागेल की नाही?
प्रेम बिऱ्हाडे याने 2 व्हीडिओ मध्ये स्वतःच सांगितलं आहे, की कॉलेजने 2 शिफारस पत्र ( recommendation letters ) दिले होते. जर खरोखर संपूर्ण मॉडर्न कॉलेज जातीयवादी असेल, तर ते 2 पत्र कसे दिले होते? आता verification जातीमुळे थांबवून ठेवलं याचा काय पुरावा आहे? कॉलेजने तर नोकरीच गेली नाही असाही दावा केला आहे, त्यावर प्रेम ने termination लेटर दाखवणं, नेमका काय ईमेल केला होता आणि नेमकं काय उत्तर आलं याचा सविस्तर खुलासा करणं अपेक्षित नाहीये का? की फक्त आरोपांच्या reel बनवल्या की अन्याय सिद्ध होतो?
दुसऱ्या व्हीडिओ मध्ये प्रेम व्हाट्सअप्प च्या चॅट चे प्रिंट दाखवताना दिसतो. पण ते पेपर एक सेकंदही कॅमेऱ्यासमोर न धरता लगेच ठेवूनही देताना दिसतो. तो हा दावा करतो की फोनवर त्याची जात विचारली गेली. त्याने "जातीचा काय संबंध" असं विचारल्यावर "व्हेरिफिकेशन साठी विचारलं" हे उत्तर आल्याचं तो स्वतःच सांगत आहे. तरीही ज्या व्यक्तीने हे प्रश्न विचारले त्याचाही point of view समाजापुढे मांडणं ही मीडियाची जबाबदारी आहे की नाही?
कॉलेजच्या सांगण्यानुसार 2-3 reminder पाठवल्यानंतर डिटेल्स अपलोड केले गेले. मुळात अनेक कॉलेजमध्ये हा ढिसाळ कारभार चालत असून अतिशय संवेदनहीनपणे हळू काम करण्याची वृत्ती अनेक ठिकाणी दिसून येते. मात्र असे अनुभव जरी त्रासदायक असले, तरी ते जातीमुळे आलेले नसतात. ते कर्मचाऱ्यांच्या सहकार्य न करण्याच्या वृत्तीमुळे आलेले असतात. दरवर्षी अनेक गरीब, दलित विद्यार्थी जे मागासवर्गीय स्कॉलरशिप साठी पात्र असतात त्यांची कामं खोळंबतात. कारण दलित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारी बार्टी नावाची संस्था संविधान दिंडीचा propoganda करण्यात व्यस्त असते. मात्र तेव्हा कधीही बार्टीच्या अधिकाऱ्यांवर चौकशी होत नाही, कारण हा खरोखरच दलित विद्यार्थ्यांच्या हिताचा प्रश्न असतो आणि यात कोणता ब्राह्मण, मराठा, हिंदू, सनातनी असला राजकीय फालतुपणा करण्याचा स्कोप नसतो.
मात्र जेव्हा असा स्कोप मिळाला, तेव्हा दलितांचे so called कैवारी जागे होतात. मूळ प्रश्न कसा सोडवायचा याकडे दुर्लक्ष करून स्वतःचं ऍक्टिव्हिजम करियर कसं चमकेल याचा विचार करतात (आंदोलन हा एक नव्या प्रकारचा रोजगार झाला आहे).
प्रेम बिऱ्हाडे याला आलेला संतापजनक अनुभव त्याने जशास तसा share केला असता, आणि कॉलेजच्या ढिसाळ कारभारामुळे माझा जॉब गेला एवढंच पुराव्यासह सांगितलं असतं, तर त्याला व्यापक प्रतिसाद मिळाला असता. पण "तुम्हाला आमची लोकं पुढे गेलेली बघवत नाहीत" हे सगळ्याच बाबतीत म्हणण्याचा हा वेगळाच मानसिक आजार सध्या वाढतो आहे. अन्याय संपवण्या ऐवजी त्याला जातीय दृष्टीने ग्लोरिफाय करून जास्त मोठी मजल मारता येते अशी परिस्थिती आपण स्वतःच निर्माण करून ठेवली आहे का? यावर विचार केला पाहिजे.
त्याशिवाय, जर खरोखरच इतर जातीच्या विद्यार्थ्यांना सहजपणे मदत होत असेल आणि प्रेम ला फक्त जातीमुळे अडवून ठेवलं असेल तर ते सिद्ध करण्याची जबाबदारी प्रेम ची आहे. त्यासाठी त्याने झालेली चॅट, कंपनीने केलेलं कम्युनिकेशन व इतर संबंधित इ मेल चे फोटो सार्वजनिक केले पाहिजेत. कॉलेजलाही स्वतःचं मत मांडण्याचा अधिकार वापरू दिला पाहिजे. आणि कॉलेजच्या पदाधिकाऱ्याने जातीय मानसिकतेतूनच मुद्दाम अडवणूक केली असेल तर त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे. पण जर हे जातीयवादी मानसिकतेतून झालेलं नसेल, तर समाजात तेढ निर्माण करणारे माथेफिरू कार्यकर्ते आणि व्हेरिफाय न करता बातम्या देणारे मीडिया चॅनल्स यांच्यावर जातीय सलोखा बिघडवण्यासाठी कारवाई होणार का? स्वतःच्या अनुभवाला गैरसमजातून किंवा मुद्दामहून जातीय रंग दिल्याबद्दल स्वतः प्रेम बिऱ्हाडेला समज दिली जाणार का? हे प्रश्नही महत्त्वाचे आहेत.
अशाप्रकारे भेदभाव केल्याने दोन्ही समाजातील तेढ अजूनच वाढते व मूळ समस्या बाजूलाच राहून दोन्ही गटातील लोक जातीयवादी शिवीगाळ करण्यात व्यस्त होतात. संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा याहून मोठा गैरवापर असू शकत नाही.
त्याशिवाय दलित ऍक्टिव्हिजम म्हणजे फक्त हिंदू धर्माला, सवर्ण जातींना शिव्या देणं, त्यांच्याविरुद्ध खालच्या थराला जाऊन बोलणं, हा reverse castism असून तो सुद्धा संविधानातील समतेच्या तत्वाच्या विरोधात आहे. इतिहासात अन्याय, झालेल्या सुमारे एक हजार जात समूहांपैकी मात्र ठराविकच घटक तेढ वाढवण्यासाठी कार्यरत असून इतर शेकडो जातींच्या लोकांचे प्रश्न यांच्यामुळे समोरच येत नाहीत. त्यामुळे सवर्ण जातींनीही आंदोलनजीवी लोकांचे 2-4 उदाहरण पाहून खऱ्या वंचितांच्या बद्दल मनात आकस व पूर्वग्रह बाळगू नये व सत्य पडताळणी होईपर्यंत धीर धरावा.
- प्रथम उवाच
0 Comments